Showing posts with label हिरवळीचे खत ढेंचा. Show all posts
Showing posts with label हिरवळीचे खत ढेंचा. Show all posts

Tuesday, March 29, 2011

अखिल भारतीय हळद परिषद २०११

अश्वमेध कृषि दूत आणि अश्वमेध हर्बल रिसर्च , डेव्हलेपमेंट ट्रस्ट , कोपरगाव आयोजित अखिल भारतीय हळद परिषद २०११काल शिर्डी मध्ये पार पडली.महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून शेतकरी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे
१- मधुकर दंडवते साहेब -
२- मा. दत्तू नाना कोल्हे साहेब -
३- मा. नारायण पावसे साहेब
४- मा. विनायकराव दंडवते साहेब
५- मा. वाघ साहेब
६- डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे साहेब उपस्थित होते .
नारायण पावसे साहेबांनी हळद पिकाचे महत्त्व सांगितले जगातील ८० % उत्पादन भारतात होते आणि प्रामुख्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , कर्नाटका , आसाम, महाराष्ट्रात सांगली, सातारा, हिंगोली, चंद्रपूर जिल्ह्यात उत्पादन होते.
महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड महत्त्वाची बाजारपेठ . हळदीची वायदे बाजारात उलाढाल सुरु झालेली असल्याने तिचे महत्त्व वाढत आहे.
त्यांनी कमी उत्पन्नाचे कारणे सांगितले
१- पारंपारिक पद्धत
२- सिंचनाचा अभाव
३-प्रक्रिया न केलेले , कीडयुक्त बेणे
४- संतुलित खतांचा अभाव
५- कीड आणि रोगाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने नाही.
६- काढणी नंतरचे तंत्रज्ञान माहिती कमी
नंतर
ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
बिनचूक तांत्रिक माहिती मिळत नसल्याने शेतकरी संकुचित होतो आहे. हळद पीकाला सोन्यासारखे भाव मिळत आहे तरी देखील पिकाविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळत नाही . शेती आधुनिक पद्धतीने कारणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी हि हळद परिषद आयोजित केलेली आहे.
त्यांनी हळद लागवडीसाठी मे ते जून हे महिने उपयुक्त असल्याचे सांगून लागवड अक्षय तृतीयेला करावी असे सांगितले.
एकरी ६ ते ७ क्वि. मातृकंद शक्यतो वापरावे. गादी वाफ्यावर लागवड करावी. रुंद गादी वाफा बनवणे , बेड ६० * ७५ से मी उंची एक ते दीड फुट आणि दोन ओळीतील अंतर ४० * २५ से मी , दोन ओळीत एक इनलाइन वापरावे. त्यामुळे बेणे कमी लागते , झाडांची संख्या योग्य राहते , ३० ते ३५ क्वि उत्पादन मिळते. हळद लागवडीनंतर १५ दिवसात उगवते , १५ दिवसानंतर साडे पाच महिन्यापर्यंत पानच वाढतात , साडे पाच महिने ते साडे सात महिने बगल गड्डा अवस्था त्यामध्ये कंद वाढतो जवळजवळ ५ते ७ फुटवे होतात . आणि नंतर साडे सात महिने ते नऊ महिने हळकुंड भरणे अवस्था अशा प्रकारे नऊ महिन्याचे हे पिक आहे. ठिबक संचाचा वापर केल्याने पाणी ६० % बचत होऊन उत्पादनात ४० % वाढ होते. उत्त्पन्न ओली हळद - १७० ते १९० क्वि आणि सुकल्यानंतर ३० ते ४० क्वि. हळद पिक घेतल्यानंतर परत त्याच जमिनीत हळद पिक घेऊ नका असे त्यांनी सांगितले .

Friday, June 25, 2010

हिरवळीचे खत - ढेंचा


हिरवळीचे खत
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे. परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खतांची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते शेतीला व शेतकरयांना वरदान ठरू शकतात. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानासह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडणे होय. हि पिके जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात.
हिरवळीचे खते दोन प्रकारचे आहेत-
१- हिरवळीच्या खताचे पिक शेतात वाढवून फुलोरयापूर्वी ते जमिनीत गाडणे.[उदा.बोरू , ढेंचा, चवळी इत्यादी.]
२-हिरवळीच्या खताचे पिक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे, गाडणे [उदा. गिरिपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी.]
ढेंच्या लागवड अशी करा.
वखराच्या [कुळवाच्या ] आडव्या उभ्या पाळ्या देऊन शेत तयार करून घ्यावे. त्यानंतर दीड ते दोन फुट अंतरावर सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस ढेंच्या बियाणे पेरावे. एकरी २० ते २५ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ पाणी द्यावे. नांगर किंवा ट्रक्टरने नांगरून जमिनीत गाडावे. १०-१२ दिवसानंतर वखराच्या [कुळवाच्या] आडव्या उभ्या पाळ्या देऊन सर्व अवशेष जमिनीत मिसळून पुढील पिकासाठी शेत तयार करावे.

ढेंच्या हिरवळीच्या खताची वैशिष्ट्ये
-ढेंच्या हलक्या , मध्यम , भारी आणि क्षारयुक्त जमिनीतही भरपूर वाढतो.
-ढेन्च्याचे वाढीवर कमी ओल किंवा अधिक पाणी ह्याचा फारसा वाईट परिणाम होत नाही.
-ढेन्चाची वाढ झपाट्याने होत असल्याने केवळ ४५-५० दिवसांनतर जमिनीत गाडल्यामुळे पूर्णपणे कुजून त्याचे खत पुढील पिकास उपलब्ध होते.
-ढेन्चापासून प्रती एकर ८० क्विंटल हिरवळीचे खत मिळते जे एकरी २२४ क्विंटल शेणखताएवढा फायदा शेतकऱ्यास देते. [१ क्वि. हिरवळीचे खत = २.८ क्वि. शेणखताचे सत्त्व]
-ढेंचा कुजत असतांना सूक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषक सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते, पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते.
-ढेन्चामुळे भरपूर कॅल्शियम उपलब्ध होऊन जमीन चिबड करणारे पाण्यात न विरघळणारे सोडीयमचे क्षार द्राव्य अवस्थेत येऊन पावसाचे वा ओलिताचे पाण्याद्वारे त्यांचा निचरा होऊन अशा जमिनींची सुपीकता वाढते.
-ढेंचा द्विदलवर्गीय पिक असल्याने वातावरणातील नत्र जमिनीत साठवून ठेवण्यास मदत करते.
-ढेन्चामुळे पुढील पिकास प्रती एकर ३५ किलो नत्र , ७.३ किलो स्फुरद , १७.८ किलो पालाश , १.९ किलो गंधक , १.४ किलो कॅलशियम, १.६ किलो म्याग्नीशियम हि अन्नद्रव्ये आणि जस्त- २५ पी.पी.एम., लोह-१०५ पी.पी.एम.,तांबे - ७ पी.पी.एम. हि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...