Showing posts with label माती परीक्षण. Show all posts
Showing posts with label माती परीक्षण. Show all posts

Tuesday, March 29, 2011

अखिल भारतीय हळद परिषद २०११

अश्वमेध कृषि दूत आणि अश्वमेध हर्बल रिसर्च , डेव्हलेपमेंट ट्रस्ट , कोपरगाव आयोजित अखिल भारतीय हळद परिषद २०११काल शिर्डी मध्ये पार पडली.महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून शेतकरी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे
१- मधुकर दंडवते साहेब -
२- मा. दत्तू नाना कोल्हे साहेब -
३- मा. नारायण पावसे साहेब
४- मा. विनायकराव दंडवते साहेब
५- मा. वाघ साहेब
६- डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे साहेब उपस्थित होते .
नारायण पावसे साहेबांनी हळद पिकाचे महत्त्व सांगितले जगातील ८० % उत्पादन भारतात होते आणि प्रामुख्याने तामिळनाडू , आंध्र प्रदेश , कर्नाटका , आसाम, महाराष्ट्रात सांगली, सातारा, हिंगोली, चंद्रपूर जिल्ह्यात उत्पादन होते.
महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड महत्त्वाची बाजारपेठ . हळदीची वायदे बाजारात उलाढाल सुरु झालेली असल्याने तिचे महत्त्व वाढत आहे.
त्यांनी कमी उत्पन्नाचे कारणे सांगितले
१- पारंपारिक पद्धत
२- सिंचनाचा अभाव
३-प्रक्रिया न केलेले , कीडयुक्त बेणे
४- संतुलित खतांचा अभाव
५- कीड आणि रोगाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने नाही.
६- काढणी नंतरचे तंत्रज्ञान माहिती कमी
नंतर
ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी खूप महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
बिनचूक तांत्रिक माहिती मिळत नसल्याने शेतकरी संकुचित होतो आहे. हळद पीकाला सोन्यासारखे भाव मिळत आहे तरी देखील पिकाविषयी पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळत नाही . शेती आधुनिक पद्धतीने कारणे हि काळाची गरज आहे. त्यासाठी हि हळद परिषद आयोजित केलेली आहे.
त्यांनी हळद लागवडीसाठी मे ते जून हे महिने उपयुक्त असल्याचे सांगून लागवड अक्षय तृतीयेला करावी असे सांगितले.
एकरी ६ ते ७ क्वि. मातृकंद शक्यतो वापरावे. गादी वाफ्यावर लागवड करावी. रुंद गादी वाफा बनवणे , बेड ६० * ७५ से मी उंची एक ते दीड फुट आणि दोन ओळीतील अंतर ४० * २५ से मी , दोन ओळीत एक इनलाइन वापरावे. त्यामुळे बेणे कमी लागते , झाडांची संख्या योग्य राहते , ३० ते ३५ क्वि उत्पादन मिळते. हळद लागवडीनंतर १५ दिवसात उगवते , १५ दिवसानंतर साडे पाच महिन्यापर्यंत पानच वाढतात , साडे पाच महिने ते साडे सात महिने बगल गड्डा अवस्था त्यामध्ये कंद वाढतो जवळजवळ ५ते ७ फुटवे होतात . आणि नंतर साडे सात महिने ते नऊ महिने हळकुंड भरणे अवस्था अशा प्रकारे नऊ महिन्याचे हे पिक आहे. ठिबक संचाचा वापर केल्याने पाणी ६० % बचत होऊन उत्पादनात ४० % वाढ होते. उत्त्पन्न ओली हळद - १७० ते १९० क्वि आणि सुकल्यानंतर ३० ते ४० क्वि. हळद पिक घेतल्यानंतर परत त्याच जमिनीत हळद पिक घेऊ नका असे त्यांनी सांगितले .

Wednesday, June 30, 2010

SOIL TESTING-माती परीक्षण - का व कशासाठी-


माती परीक्षण - का व कशासाठी
शेतातील मातीच्या नमुन्याचे भौतिक , रासायनिक व जैविक पृथक्करण करून त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासणे यास माती परीक्षण म्हणतात.
महत्त्व
१- उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजते
२-जमिनीमधील दोष समजतात
३-जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
४-जमीन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येते.
५-आवश्यक तेवढेच खत व संतुलित खतांचा पुरवठा झाल्यामुळे आर्थिक बचत व उत्पादनक्षमता टिकून राहते.
मातीचा नमुना घेण्याची पद्धत
शेतातील नमुना योग्य पद्धतीने घेणे हि माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्त्वाची बाब आहे. वर्षभरात नमुने कधीही काढता येतात.तथापि , पाऊस झाल्यावर , पाणी दिल्यानंतर , वाफसा नसतांना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढू नयेत. जमिनीत पिक घेण्याच्या हंगामापूर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे.
१-जमिनीचा रंग, चढ उतार , खोली , खडकाळ किंवा खोलगटपणा, पाणथळ , निचऱ्याची परिस्थिती अशा भागाचा विचार करून शेताचे निरनिराळे विभाग पडावेत. अशा प्रकारे शेतातील निरनिराळ्या ठिकाणचे नमुने घेऊन त्यापासून प्रातिनिधिक नमुना तयार करावा. प्रत्येक विभागातून १० ते १२ ठिकाणच्या मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात किंवा पोते यावर घ्यावे. त्याचे चार समान भाग करून समोरासमोरचे दोन भाग घ्यावेत. अशा प्रकारे अर्धा किलो माती होईपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी.
२-केळी, द्राक्षे, डाळिंब, उस, कापूस - २० ते २५ से मी खोलीपर्यंत नमुना घ्यावा.
३-भाजीपाला , तेलवर्गीय पिके - १० ते १५ से मी खोलीपर्यंत नमुना घ्यावा.
४-फळ बागायती पिके- १०० से मी खोलीपर्यंत नमुना घ्यावा.
मातीचा नमुना काढतांना घ्यावयाची काळजी
१-शेतात जनावरे बसण्याची जागा , खत, कचरा टाकण्याच्या जागा , विहिरीचे आणि शेताचे बांध या जागेतून मातीचे नमुने घेऊ नये.
२-शेतात रासायनिक खते टाकली असल्यास २ ते अडीच महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये
३- निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नये.
४-झाडाखालील , पाणथळ जागेतील व माती वाहुन गेलेल्या जागेतील मातीचा नमुना घेऊ नये.
५-ठिबक सिंचन असल्यास वेटिंग बोलच्या कडेचा नमुना घ्यावा
६-रासायनिक खताच्या रिकाम्या केलेल्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत.
मातीच्या नमुन्याबरोबर खालील माहिती पाठवावी.
१- शेतकऱ्याचे नाव व पत्ता
२-नमुना घेतल्याची तारीख व नमुना घेतलेल्या जमिनीची खोली
३-गट नं , सर्वे नं व एकूण क्षेत्र
४-जमिनीचा प्रकार व खोली
५-पाण्याचा स्रोत व जमिनीचा निचरा
६- सिंचन पद्धती
७- मागील हंगामात घेतलेले पिक व पुढील हंगामात घेण्याचे पिक व जात
८- पिक लागवडीमध्ये आलेल्या विशिष्ट अडचणी

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...