Thursday, November 25, 2010

कांदा - रोपांची पुनर्लागण

रोपांची पुनर्लागण
सपाट वाफ्यांना पाणी देऊन त्यात रोपांची लागवड केली जाते. रब्बी हंगामात १० x १० से मी या अंतराप्रमाणे २ x ३ मीटर आकाराच्या सपाट वाफ्यात अनुक्रमे ४०० ते ६०० रोपे बसतात. रोपे लावताना ती अंगठ्याने दाबून लावल्यामुळे कांद्याच्या माना वाकड्या होतात. कांदा वाढीस वेळ लागतो. रोपे अंगठ्याजवळील पहिल्या बोटाबरोबर जमिनीत घुसवावीत. जमिनीची मशागत चांगली झाली असेल आणि वाफ्यातील माती चांगली मऊ आणि भुसभुशीत असेल तर कोरड्यात रोपांची लागवड करून नंतर पाणी दिले तर रोपे चांगली जगतात.
ठिबक किंवा तुषार सिंचनाखाली लागवड करावयाची झाल्यास ठिबक किंवा तुषार संच लागवडी अगोदर चालू करावा. साधारणपणे ३ ते ४ से मी खोलीवर ओल जाईल इतपत पाणी द्यावे. दुस-या दिवशी वाफ्यावर रोपांची लागवड करावी आणि नंतर पाणी द्यावे
रोपे ५० ते ५५ दिवसात लागवडीसाठी तयार होतात. लागवडीच्यावेळी रोपांची गाठ लहान हरभ-याएवढी झाली पाहिजे. रोपे उपटण्या अगोदर वाफ्यांना हलके पाणी द्यावे म्हणजे रोपे , मुळे विशेष न तुटता उपटता येतात. रोपे उपटल्यानंतर त्याच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग कापून टाकावा व मुळे पाण्यात धुवून घ्यावीत.

कांदा रोप वाटिका तयार करणे

रोप वाटिका तयार करणे
निरोगी रोपे तयार करून त्यांची लागवड केली म्हणजे कांदा उत्पादनाची निम्मी लढाई जिंकली असा अर्थ होतो. एक हेक्टर कांदा लागवडीसाठी जवळ - जवळ १० ते १२ गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते. रोप वाटीकेची जागा पाण्याच्या स्त्रोताजवळ असावी म्हणजे वेळच्या वेळी पाणी देणे सोपे होते. लव्हाळा किंवा हराळी यासारखे गवत असणारी तसेच पाणी साचणारी सखल भागाची जमीन रोप वाटीकेसाठी टाळावी .रोप नेहमी गादी वाफ्यावर तयार करणे चांगले कारण गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजणे किंवा सडणे हा प्रकार होत नाही. त्यामुळे रोपे सहज उपटून काढता येतात. गादी वाफे १ मीटर रुंद व ३ ते ४ मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची १५ से मी ठेवावी . गादी वाफे नेहमी उताराला आडवे करावेत. वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत आणि ५० ग्रॅम मिश्रखत घालावे. खते आणि वाफ्यातील माती मिश्र करून त्यावरील दगड किंवा बारीक ढेकळे वेचून घ्यावीत आणि वाफा सपाट करावा. रुंदीशी समांतर चार बोटे अंतरावर रेघा पाडाव्यात आणि त्या बी पातळ पेरून मातीने झाकून टाकावे. नंतर झारीने पाणी द्यावे. पाणी जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने द्यावे. जर गादी वाफा करणे शक्य नसेल तर नेहमीप्रमाणे सपाट वाफे करावेत .वाफ्याची रुंदी १ मीटर आणि लांबी ३ ते ४ मीटर ठेवावी. त्यात वरीलप्रमाणे बियाणे पेरावे. बियांची उगवण क्षमता चांगली असेल तर एक हेक्टर लागवडीसाठी ६ ते ७ किलो बी पुरेसे होते. साधारणपणे प्रत्येक चौरस मीटरवर १० ग्रॅम बी पेरावे. म्हणजे एका वाफ्यावर ३० ग्रॅम बी पेरावे. बी फेकून पेरले तर दोन ओळी आणि रोपे यांमध्ये समान अंतर राखता येत नाही . म्हणून बी नेहमी ओळीतच पेरावे. लागावणीसाठी रोपे ५० ते ५५ दिवसात तयार होतात.

Tuesday, November 23, 2010

कांदा जमिन

जमिन
मध्यम ते भारी , चांगली निचरा असणारी २५ ते ९० सेमी खोलीची जमीन चांगली मानवते. हलक्या व मध्यम भारी जमिनीत कांदा चांगला पोसतो. क्षारवट व चोपण जमिनी कांद्यास मानवत नाही, उथळ हलक्या जमिनीत खतांचा वापर करून लागवड उपयुक्त ठरते . सामू ६.५ ते ७ असलेली जमीन चांगली.पानथळ जमिनीत लागवड टाळावी.

कांदा हवामान

हवामान
कंद वर्गातील भाज्यामध्ये व्यापारीदृष्ट्या कांदा हे सर्वात महत्त्वाचे पिक आहे. देशाच्या २५ टक्के उत्पादन एकटया महाराष्ट्रात होते . महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा प्रथम स्थानावर आहे. मुख्यत: हिवाळी हंगामातील पिक १० ते १२ तासांच्या सूर्य प्रकाशात चांगली वाढ होते . कांदा पिक उष्ण कटिबंधात वाढणारे असून समशितोष्ण हवामान चांगले मानवते. जास्त थंड व दमट हवामानात करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो . कांद्याच्या पानांची चांगल्या वाढीसाठी सरासरी १० ते १५ अंश सेल्सिअस तर कांदा चांगला पोसण्यासाठी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान तर काढणीसाठी ३० अंश सेल्सिअस आवश्यक आहे

KRISHIRAJA

Photobucket

Featured Post

कांदा- खत व्यवस्थापन

खत व्यवस्थापन कांदा पिकाला नत्र खताचा वापर माफक प्रमाणात करावा. सल्फर [गंधक ] जरूर वापरावे त्यामुळे कांदा साठवणीसाठी चांगला टिकतो. हलक्या जम...